विशेष

पूरग्रस्तांच्या मदतीला श्री विठुराया धावला,   मुख्यमंत्री सहायता निधीस 1 कोटींची मदत

पूरग्रस्त नागरिकांना श्रींचा प्रसाद म्हणून महावस्त्रांचे वितरण

पंढरपूर दि.28 :- राज्यातील विविध भागांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहेत. या परिस्थितीत मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व देवस्थानांना मदतीचे केले असून यास प्रतिसाद देत पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने एक कोटी रुपयांची मदत सहायता निधीस दिली आहे.

 सामाजिक उत्तरदायित्व व मानवतावादी भूमिकेतून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने मुख्यमंत्री सहायता निधीस एक कोटी रुपयांची मदत व त्याचबरोबर पूरग्रस्त नागरिकांना श्रींच्या प्रसादरूपाने महावस्त्रे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगीतले.

मंदिर समिती प्रत्येकवेळी पूरग्रस्त नागरिकांना फूड पॅकेट वाटप करीत असते. यावेळी जिल्हा प्रशासनास देखील आवश्यक ती मदत करण्यात येत असून, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, लाडूप्रसाद उपलब्ध करून देण्यात येत आहे. मंदिर समितीकडून यापूर्वीही राज्यावर आलेल्या आपत्तीच्या काळात मदत केली गेली आहे. विशेष म्हणजे सन 2013, 2015, 2018 व 2020 या काळातही मंदिर समितीमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीस प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत करण्यात आली होती.

मंदिर समितीची सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली 26 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता दुरदृष्य प्रणालीद्वारे सभा संपन्न झाली. या सभेस सदस्या शकुंतलाताई नडगिरे, डॉ.दिनेशकुमार कदम, भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, ॲड.माधवीताई निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प.शिवाजीराव मोरे तसेच कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्र. व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत, लेखा अधिकारी मुकेश अनेचा उपस्थित होते. या सभेत शासन मान्यतेने मुख्यमंत्री सहायता निधीस 1 कोटीची मदत तसेच श्री रूक्मिणीमातेचा प्रसाद म्हणून महावस्त्रे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

श्रीं विठ्ठल रूक्मिणी मातेच्या कृपेने संकटकाळात समाजाच्या सेवेसाठी पुढे येणे हीच खरी विठ्ठलभक्ती आहे. पूरग्रस्तांना मदत करणे ही मंदिर समितीचे सामाजिक व नैतिक कर्तव्य असून या आपत्तीमध्ये मंदिर समितीमार्फत प्रशासनास आवश्यक ती मदत करण्यात येत आहे,  अशी प्रतिक्रियागहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close