विशेष

आठ दिवसात विठ्ठल ची बिलं ऊस उत्पादकांना मिळू शकतात, भालकेंचे यासाठी भगिरथी प्रयत्न, पुढील हंगाम घेण्याची तयारीही सुरू


पंढरपूर- मागील हंगामात गाळप केलेल्या उसाच्या एफआरपी बिलासाठी तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे विचारणा होत होती. गेले काही दिवस याची तजवीज करण्यासाठी अध्यक्ष भगीरथ भालके हे प्रयत्न करत होते. अखेर यास यश आले असून येत्या आठ दिवसाची उसाच्या बिलाची रक्कम शेतकर्‍यांना मिळेल असे सुतोवाच त्यांनी कारखान्यात संचालक मंडळाच्या बैठकीनंतर केले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी उसाची एफआरपी अद्याप पूर्ण केलेली नाही. पंढरपूर तालुका व शेजारील भागातील साखर कारखानेही यासाठी पैशाची उभारणी करत आहेत. मात्र विधानसभा पोटनिवडणुकीनंतर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे बिलाची रक्कम मागण्यासाठी आंदोलन सुरू झाली होती. कालच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील व सहकार्‍यांनी ऊसबिले न देणार्‍या कारखान्यांचे गार्‍हाण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कानावर घातले होते. दरम्यान सोमवारी 23 ऑगस्ट रोजी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळ बैठक पार पडली. यानंतर अध्यक्ष भगीरथ भालके यांनी आठ दिवसात ऊसबिले व कामगारांचे थकीत पगार दिले जातील याचे सुतोवाच केले आहे.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची आर्थिक स्थिती थोडी बिघडली असल्याने बिलं थकीत राहिली आहेत. मात्र यासाठी निधीची उभारणी करण्याचा प्रयत्न भगीरथ भालके हे सतत करत होते. दरम्यानच्या काळात त्यांनी शासन दरबारी तसेच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचीची भेट घेवून कारखान्याच्या अडचणींसदर्भात चर्चा केली आहे. भालके यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका पक्षाची आहेत. दरम्यान आता नवीन हंगाम सुरू होत असून यासाठी कारखान्याची तांत्रिक कामे करणे गरजेचे आहे. यासाठीही राज्यातील बहुंताश कारखान्यांना मदत करण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारची असून पूर्व हंगामी कर्जांना थकहमी देण्याची तयारी आहे. यंदा सोलापूर जिल्ह्यासह अन्यत्र उसाची उपलब्धता जास्त असल्याने जास्तीत जास्त साखर कारखाने गाळपात उतरविले जाणार आहेत. यातच साखरेचे दर वाढत असल्याने कारखानदारीची गाडी हळूहळू सुरळीत होईल अशी आशा सर्वांना आहे. अडचणीत असणार्‍या कारखान्यांना जर चांगले एक दोन हंगाम मिळाले तर आर्थिक घडी पुन्हा बसू शकते.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची ऊसबिलाची जी रक्कम थकीत आहे तिचे वाटप आठ दिवसात केले जाईल असे सांगितले जात आहे. यासाठी पुढील सोमवारचा मुहूर्त निवडला जाईल असे दिसते. दरम्यान संचालक मंडळाच्या आजच्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे. याच बरोबर पुढील गळीत हंगाम सुरू करण्याविषयीही चर्चा झाली. लवकरच याबाबत शासनस्तरावरून ही कारखान्यांना मदत होवू शकते.

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close