विशेष

उजनी मृत पाणीसाठ्याच्या उंबरठ्यावर

उपयुक्त पाणीसाठा दोन दिवसात संपणार

पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणाची वाटचाल आता मृत पाणीपातळीकडे सुरू असून धरणात केवळ तीन टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. येत्या दोन दिवसात प्रकल्पातील मृत साठ्यातील पाण्याचा वापर सुरू होणार आहे.
उजनीमधून सध्या सिंचनासाठी विविध योजनांमध्ये पाणी सोडणे सुरू आहे. याचबरोबर भीमा नदीकाठच्या पाणी योजनांसाठी नदीपात्रात विसर्ग सुरू असल्यामुळे पाणी पातळी झपाट्याने खालावली आहे. रोज धरणातील दोन टक्के म्हणजेच सुमारे एक टीएमसी पाणी कमी होत आहे.
सध्या उजनीतून सिंचनासाठी आवर्तन सुरू असून मुख्य कालव्यात 2950 क्युसेक तर भीमा सीना जोडकाव्यात 660 ,दहिगाव योजनेसाठी 60 व सीना माढा योजनेसाठी 333 क्युसेक चा विसर्ग सुरू आहे. याचबरोबर भीमा नदीकाठच्या सोलापूरसह पंढरपूर ,मंगळवेढा , सांगोला व अन्य गावांच्या पाणी योजनांसाठी म्हणून नदीपात्रात वीज निर्मिती करता 1600 व गाळमोरीतून 4 हजार 400 असा एकूण 6 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे.
उजनी धरणामध्ये एकूण पाणीसाठा हा 1856.83 दशलक्ष घनमीटर म्हणजे 65.57 टीएमसी इतका असून यातील उपयुक्त पाणी हे 54.02 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 1.91 टीएमसी इतके शिल्लक आहे. उजनी धरणातून सिंचनासाठी तसेच भीमा नदी पात्रात सोडण्यात येत असलेले पाणी पाहता धरण शुक्रवारी मृतसाठ्यात आपला प्रवास सुरू करणार हे निश्चित आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपलेला असेल.
सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून मागील 24 तासांमध्ये धरणातील 7.09 मिलिमीटर म्हणजेच 1.25 दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचे बाष्पीभवन नोंदले गेले आहे. जसजशी उन्हाची तीव्रता वाढेल तसतसे पाण्याचे बाष्पीभवन ही वाढत जाणार आहे.


पावसाळा दोन महिने दूर
उजनी धरण हे एप्रिलच्या मध्याला आपला मृत पाणी पातळीतील प्रवास सुरू करत असून पावसाळा आणखीन दोन महिने दूर आहे. आता धरणातील मृतसाठ्यातील पाण्याचा वापर हा सिंचन व पाणी योजनांसाठी करावा लागणार आहे. सध्या सिंचनाचे आवर्तन सुरू आहे तर भीमा नदीतील पाणी हे येत्या काही दिवसात बंद केले जाणार आहे.

गतवर्षीपेक्षा यंदा चांगली स्थिती
2024 ला फेब्रुवारी महिन्यातच उजनीच्या मृतसाठ्यातील पाण्याचा वापर सुरू झाला होता. व धरण जून महिन्यात वजा -59.99% अशा नीचांकी स्थितीमध्ये पोहोचले होते. 2024 च्या पावसाळा हंगामात झालेल्या चांगल्या पर्जन्यामुळे धरण क्षमतेने भरले. यामुळे रब्बी व उन्हाळा हंगामात सिंचनासाठी मुबलक पाणी देता आले आहे. जून 2024 ला उजनी धरण वजा – 59.99% होते. यानंतर पावसाने चांगली हजेरी लावल्याने धरण ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात शंभर टक्के भरले होते. यातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आला होता. मुबलक पावसामुळे उजनी धरण क्षमतेने म्हणजे 111 टक्के भरले होते.

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close