पंढरपूर कॉरिडॉरसाठी जबरदस्तीने भूसंपादन केले जाणार नाही : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

- स्थानिक नागरिक, व्यापारी, विक्रेते यांना विश्वासात घेऊनच पंढरपूरचा कॉरिडॉर : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

पंढरपूर:-श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो आणि दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येतात. पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. विकास आराखडा तयार करताना लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक, व्यापारी, वारकऱ्यांना विश्वासात घेवूनच करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
पंढरपूर येथील कॉरिडॉरबाबत स्थानिक नागरिक व्यापारी विक्रेते यांच्याशी प्राथमिक चर्चा करून अडचणी जाणून घेण्यासाठी कॉलेज येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन समन्वयक संतोष देशमुख, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्यासह मंदिर परिसरातील नागरिक, व्यापारी, विक्रेते उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातीच्या दर्शनासाठी दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत आहे. येणाऱ्या वारकरी भाविकांना तसेच स्थानिकांनी सुविधा देण्यासाठी विकास आराखडा करणे गरजेचे आहे.जर कॉरिडॉर झाला तर नागरिकांना विश्वासात घेऊनच केला जाणार आहे. कॉरिडॉरसाठी जबरदस्तीने भूसंपादन केले जाणार नाही. मंदिर परिसर भागातील मंदिर परिसर भागातील सर्वे्ह केबीपी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमार्फत मंदिर परिसर भागातील सर्वे्ह केला जाईल. त्यांना मालमत्ता धारक व्यापारी विक्रेते यांनी असणारे एकूण क्षेत्र, व्यवसाय त्यातून मिळणारे उत्पन्न याची माहिती द्यावी. या माहितीच्या आधारे डाटा तयार करण्यात येऊन त्याबाबत पॅकेज तयार करण्यात येईल. त्याबाबत नागरिकांचे मत घेऊनच शासनाला सादर केले जाईल. नगरपालिका व पोलीस प्रशासनाने पथक तयार करून तात्काळ शहरातील अतिक्रमणे काढावीत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
कॉरिडॉर बाबत कोणत्याही मालमत्ता धारक, विक्रेते, व्यापारी यांचे नुकसान होऊ नये यासाठी नागरी वस्तीत करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या भूसंपादनाची पाहणी व माहिती घेण्यासाठी पथक पाठवण्यात आले होते. कॉरिडॉर झाला तर कमीत कमी जागा घेऊन जास्तीत जास्त लाभ कसा देता येईल याबाबत प्रयत्न करण्यात येईल. काशी विश्वनाथ येथे कॉरिडॉर झाल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात भाविकांची संख्या वाढली आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले
.
यावेळी उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन समन्वयक संतोष देशमुख यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
1982 साली मास्टर प्लॅन करण्यात आला होता त्यावेळी मंदिर परिसरातील मालमत्ता धारक विक्रेते व्यापारी यांना नुकसान भरपाई अथवा पर्यायी जागा मिळाली नसल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी 1982 सालच्या विस्थापितांसाठी स्वतंत्र एक समिती स्थापन करून योग्यत्या कागदपत्रांच्या आधारावर नागरिकांच्या प्रश्नां बाबतचा अहवाल शासनाला सादर केला जाईल असे सांगितले.
