येत्या काळात भीमा कारखाना जिल्ह्यात क्रमांक एकचा ऊसदर देईल : विश्वराज महाडिक यांनी व्यक्त केला विश्वास



मोहोळ -मागील पंचवार्षिक निवडणुकीत दिलेली आश्वासने जवळजवळ पूर्ण केली आहेत, फक्त इथेनॉल प्रकल्प उभारणे बाकी आहे. १.५० लाख लीटरचा इथेनॉल प्रकल्प लवकरच उभारणार असून यामुळे शेतकऱ्याच्या उसाला जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न प्राधान्याने केला जाईल. आपण जिल्ह्यात क्रमांक एकचा दर देऊ , शिवाय कारखाना १५० दिवस उसावर आणि बाकी दिवस मोल्यासिसवर चालू ठेवणार आहे. वर्षातील 300 दिवसांपैकी काही दिवसच कारखाना बंद राहणार आहे. त्यामुळे शेतकरी व कामगारांचे हित जोपासण्याचे काम आम्ही करणार आहे, असा शब्द भीमा परिवाराचे युवा नेते तथा उमेदवार विश्वराज शभैय्या महाडिक यांनी दिला.
भीमा कारखाना हा महाडिकांच्या नावे तर शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे. शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना बंद कसा पडावा यासाठी अनेकवेळा विरोधकांनी प्रयत्न केले. खा.महाडिक यांनी असंख्य संकटाला तोंड देत खंबीरपणे कारखाना सुरू ठेवला. भीमा कारखान्याचा काटा काटेकोरपणे ठेवत कोणताही उपपदार्थ निर्मितीचा प्रकल्प नसताना उसाचा दर चांगला देण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. संचालक मंडळांनी यंदा निर्णय घेऊन ११ आल्यावर २ हजार ६०० रुपये दर जाहीर केला. विरोधक म्हणतात भीमा कारखाना आमच्याकडे द्या, आम्ही २७०० प्रतिटन दर देतो. मग लोकनेते कारखान्यावर अनेक उपपदार्थ आहेत. कारखाना कर्जात नाही, तरीही तुम्ही २७०० रू .दर का देत नाही ? असा परखड सवाल विश्वराज महाडिक यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना ते म्हणाले की, स्व. भीमरावदादा महाडिक यांनी मोठ्या कष्टाने कारखान्याची निर्मिती केली. मात्र याचा फायदा सभासदांना न होता विरोधकांना झाला. विरोधकांनी भीमा कारखान्याच्या जीवावर आपले कारखाने उभारून वेगवेगळे प्रकल्प उभा केले. मात्र भीमा कारखान्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे येत्या काळात भीमा कारखान्याचा कायापालट केल्याशिवाय आणि स्वस्थ बसणार नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी बिभीषण वाघ, विठ्ठल कारखान्याचे संचालक अशोक जाधव,डॉ. लक्ष्मण किलमिसे, जयंता जाधव, भारत जाधव , कृष्णा वाघ, माऊली पिसे यांच्यासह कार्यकर्ते, सभासद व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
