Uncategorized

पंढरपूर – फलटण नवीन रेल्वे मार्गाचे अडथळे दूर, राज्य सरकार  खर्चात सहभाग नोंदविणार


पंढरपूर – बहुप्रतीक्षित पंढरपूर- फलटण नवीन रेल्वे मार्गासाठी राज्य सरकारने आर्थिक सहभाग देण्यास मान्यता दिल्याने आता हा प्रकल्प मार्गी लागणार असून मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान केंद्रीय अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशीच शिंदे- फडणवीस सरकारने याबाबतचा निर्णय घेतला आहे.
पंढरपूर- फलटण रेल्वे मार्गास मान्यता यापूर्वीच मिळाली असून यासाठी निधीची तरतूद ही केंद्रीयस्तरावर करण्यात आली आहे. मात्र राज्य सरकारने यातील खर्चाचा वाटा उचलणे अपरिहार्य असते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी या योजनेस परवानगी आणली होती. तेंव्हा ते राष्ट्रवादीत होते तरीही त्यांनी आपला राजकीय अनुभव वापरून या मार्गाला मान्यता मिळविली. यानंतर ते भाजपात आले.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील हे निवडणूक रिंगणात नव्हते, मात्र त्यांनी भाजपाची साथ केली व माढा लोकसभा मतदारसंघात कमळ फुलले व फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे खासदार झाले. त्यांनीही हा रेल्वे मार्ग तयार व्हावा , यासाठी सतत केंदीयस्तरावर प्रयत्न केले आहेत. नुकतेच त्यांनी रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. यात त्यांना निधीची तरतूद केली जात असल्याचे सांगण्यात आले होते.
नवीन रेल्वे मार्ग तयार करताना ज्या राज्यात हे काम होते, तेथील राज्य सरकारने खर्चाचा वाटा उचलणे आवश्यक असते. मात्र 2019 ला राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यावर त्यांनी या योजनेस पैसे देण्याचा निर्णय घेतला नाही, असा आरोप खासदार निंबाळकर यांनी सतत केला आहे. यामुळेच या मार्गाचे काम रखडले होते असे त्यांचे  म्हणणे आहे. आता राज्यात सत्तांतर होवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत असल्याने त्यांनी आता अनेक निर्णय घेतले आहे. यापूर्वीच सोलापूर- तुळजापूर- उस्मानाबाद या मार्गासाठी निधी देण्यास मान्यता देण्यात आली होती. तर आता माढा मतदारसंघातील पंढरपूर- फलटण रेल्वे मार्गासाठी ही राज्य सरकार आपल्या खर्चाचा वाटा उचलणार आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी लोकसभेत मांडला जाणार असून तत्पूर्वीच राज्य सरकारने या योजनेसाठी निधीची तरतूद केली आहे. यामुळे माढा मतदारसंघासाठी महत्वाचा असणारा हा प्रकल्प आता मार्गी लागणार आहे. इंग्रजकाळापासून याची मागणी सतत होत आहे. याबाबत इंग्रजांनीही  त्यांच्या राजवटीत सर्व्हे केला होता. हा रेल्वे मार्ग  व्हावा यासाठी अनेक नेत्यांनी प्रयत्न केले आहेत. यात सर्वाधिक योगदान विजयसिंह मोहिते पाटील यांचे आहे हे मान्यच करावे लागणार आहे. याच बरोबर रेल्वे मंत्रिपद सांभालेले सुरेश प्रभू यांनी यास मान्यता दिली होती. तर आताचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळक यांनी सतत पाठपुरावा केला आहे.
या रेल्वे मार्गाचा फायदा पंढरपूर, माळशिरस, फलटण या भागाला होणार असून साखरपट्ट्यातून रेल्वे मार्ग जात असल्याने साखर वाहतूक सुलभ होईल. तसेच या भागात कृषी उत्पादन जास्त असल्याने याचा कृषिमालाची ने-आण करणे आणखी जलद होईल.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करणे हा IT Act 2000 नुसार गुन्हा आहे.
Close
Close