उजनीतून भीमेत तीन हजार क्युसेकचा विसर्ग
![](https://vedhak.com/wp-content/uploads/2023/03/kmc_20230319_190339-780x470.jpg)
![](https://vedhak.com/wp-content/uploads/2022/01/unnamed-23618584680156967980.jpg)
पंढरपूर , दि. 19 – सोलापूर शहराला पाणी पुरवठा करणारा बंधारा कोरडा पडत चालल्याने महापालिकेने उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार सोलापूर शहर व नदीकाठावरील योजनांसाठी धरणातून रविवारी सकाळी अकरा वाजल्यापासून पाणी सोडण्यास सुरूवात झाली आहे. सायंकाळी भीमा नदीत वीज निर्मितीसाठी 1600 तर सांडव्यातून 1400 असा तीन हजार क्युसेकचा विसर्ग सोडला जात होता.
धरणातून सुरूवातीला वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेकने पाणी सोडले जात असून हळूहळू नदीतील विसर्ग हा वाढविला जाणार आहे. सध्या तीव्र उन्हाळा व वाढता पाणी वापर यामुळे बंधारे कोरडे पडू लागले आहेत. पंढरपूर जवळील गुरसाळे बंधार्याच्या प्लेट चोरीला गेल्याने यातूनही पाणी गळती होवून बंधारा कोरडा पडला आहे. यासाठी भीमेत पाणी सोडण्याची मागणी होत होती. मे महिन्या पहिल्या आठवड्यापर्यंत दोन्ही कॅनॉल सुरूच राहणार आहेत, यामुळे या काठावरील सिंचनाची सोय झाली आहे.
दरम्यान उजनी धरणातून किमान पाच टीएमसी पाणी भीमा नदीत सोडले जाईल. सोलापूरला पाणी पुरवठा करणार्या बंधार्यापर्यंत पाणी पोहोचल्यावर हे आवर्तन बंद होईल. सध्या उजनी धरणात 54.21 टक्के म्हणजे 29 टीएमसी पाणी उपयुक्त पातळीत शिल्लक आहे. एकूण साठा हा 92.70 टीएमसीचा आहे. धरणातून कालव्यात 3 हजार, सीना भीमा जोडकालव्यात 1 हजार , सीना माढा जोडकालव्यात 333 तर दहिगाव योजनेत 120 क्युसेकने पाणी सोडले जात आहे.
![Header](https://vedhak.com/wp-content/uploads/2021/06/banner.jpg)