राज्य

सोलापूरसह अकरा जिल्ह्यात अनलॉकचे तिसर्‍या टप्प्यातील निर्बंध कायम राहणार

मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्यातील पंचवीस जिल्हयात निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी सोलापूरसह 11 जिल्ह्यांमध्ये सध्या अस्तित्वात असलेले तिसर्‍या टप्प्याचे निर्बंध मात्र कायम राहणार आहेत.
निर्बंध कायम असणार्‍या जिल्ह्यात पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर तर कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर व मराठवाड्यातील बीड तर उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
राज्यातील 25 जिल्ह्यातील निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. तसेच 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम राहणार असून या ठिकाणी निर्बंध कायम राहणार आहेत, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाची बैठक पार पडली. यानंंतर पत्रकारांशी बोलताना टोपे यांनी राज्यातल्या 25 जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करण्यात येतील तर उर्वरीत 11 जिल्ह्यांमध्ये कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाहीत असे सांगितले.  ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढेल तेथे स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून निर्बंध वाढण्यात येतील, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात अंतिम प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवण्यात आला आहे.
निर्बंध शिथिल करण्यात आलेल्या जिल्ह्यात शनिवार-रविवार लॉकडाऊन, शनिवार-रविवार पूर्णपणे बंदऐवजी शनिवारी संध्याकाळी 4 वाजेपर्यंत दुकानं सुरू आणि फक्त रविवारी बंद, खासगी कार्यालयांतील सर्व कर्मचार्‍यांचं लसीकरण पूर्ण झालं असल्यास अशा ठिकाणी 50 टक्के कर्मचारी क्षमतेनुसार कार्यालये सुरू करण्याची मुभा अशा गोष्टींचा समावेश असेल. शॉप, रेस्टॉरंट, सिनेमाहॉल या गोष्टींना या अटी लावून त्या सुरू करण्यात येऊ शकेल.

Header

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close