राज्य

गतवर्षीच्या तुलनेत राज्यात दहा टक्के तर उजनीत दुप्पट पाणीसाठा


पंढरपूर –  यंदाच्या उन्हाळ्यात राज्यातील सर्वच लघु, मध्यम व मोठ्या प्रकल्पांमध्ये सरासरी 58.77 टक्के पाणीसाठा शिल्लक असून तो गतवर्षीच्या तुलनेत दहा टक्क्यांनी जास्त आहे. तर सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणार्‍या  उजनी धरणात मागील वर्षीपेक्षा दुप्पट पाणी सध्या शिल्लक आहे.
उजनी धरणात याच तारखेला 2021 मध्ये 26.56 टक्के पाणी शिल्लक होते तर यंदा 54.3 टक्के जलसाठा आहे. मागील दहा दिवसांपासून दुसरे उन्हाळी आवर्तन या धरणातून सुरू असून मुख्या कालव्यात तीन हजार तर भीमा-सीना बोगद्यात 900, सीना माढा योजनेसाठी 296 तर दहिगाव उपसा सिंचन योजनेसाठी 105 क्युसेकने पाणी सोडले जात आहे. उजनी धरणात अद्याप एकूण पाणीसाठा हा 92.75 टीएमसी इतका असून यातील उपयुक्त पाणी हे 29 टीएमसी इतके आहे. सध्या कडक उन्हामुळे बाष्पीभवनात वाढ झाली असून मागील चोवीस तासात 7.32 मिलीमीटर बाप्षीभवनाची नोंद आहे.
राज्यातील एकूण 3267 लहान मोठ्या धरणांमध्ये सध्या 31 हजार 931 दशलक्ष घनमीटर एकूण पाणीसाठा असून यातील उपयुक्त जलसाठा हा 23 हजार 965 दलघमी इतका आहे.  यात मराठवाड्यात 63.33 टक्के  पाणीसाठा असून जो गतवर्षीच्या तुलनेत 13 टक्क्यांनी जास्त आहे. पुणे विभागात 64 टक्के पाणी असून जे 2021 च्या तुलनेत जवळपास 21 टक्के जास्त आहे.
राज्यातील मोठ्या धरणांचा विचार केला तर यात ही यंदा गतवर्षीच्या तुलनेत दहा टक्के जास्त पाणी आहे. सर्वात जास्त पाणी पुणे विभागात शिल्लक असून यंदा येथील 35 धरणांमध्ये 66.27 टक्के पाणी आहे, जे मागील वर्षीच्या तुलनेत 23 टक्के जास्त आहे. तर मराठवाड्यात गतवर्षीपेक्षा 7 टक्के जलसाठा जास्त असून यंदा 65.9 टक्के पाणी येथे अद्यापही उपयुक्त पातळीत शिल्लक आहे.  

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close