शरद पवार म्हणतात, शिवाजी पार्कवर ठाकरेंच्या शिवसेनेचा हक्क
![](https://vedhak.com/wp-content/uploads/2022/09/kmc_20220919_190008-780x470.jpg)
![](https://vedhak.com/wp-content/uploads/2022/01/unnamed-39083148772975259733.jpg)
कुर्डूवाडी, दि. १९ – गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षांपासून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा शिवसेना घेते. आज बाळासाहेब ठाकरे यांचेनंतर उध्दव ठाकरे हे नेतृत्व करीत त्यामुळेच शिवाजी पार्कवर त्यांचाच हक्क आहे असे स्पष्टीकरण देशाचे नेते तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनी कुर्डूवाडी येथील पत्रकार परिषदेत केले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, संजय राऊत,नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना विनाकारण तुरूंगात टाकले आहे. हा सत्तेचा गैरवापर आहे. आणि आम्ही त्यांना वा-यावर सोडले असे म्हणण्यात काही तथ्य नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ही दसरा मेळावा घेऊ शकतात, त्यांना बीकेसीचे मैदान मिळाले आता त्यांनी इतरांच्यात लुडबूड करू नये. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची शिवसेनेची परंपरा असे सांगत त्यांनी शिवसेनेची पाठराखण केली व शिवसेनेला त्याठिकाणी परवानगी देणे गरजेचे असे शरद पवार म्हणाले.
२०२४ च्या निवडणुकीत मोदी सरकार विरोधात उतरण्याची सर्वांची इच्छा आहे. यासंदर्भात ममता बॅनर्जी व नितीशकुमार यांनी माझी भेट घेऊन मते मांडली आहेत परंतू त्याबाबत ठोस निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.मात्र यामध्ये काँग्रेस पक्षाचा कसलाही अडसर नसल्याचे ते म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे नाना पटोले म्हणतात,त्यावर पवार म्हणाले त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. काही जण आम्हाला सांगतात की, काँग्रेसला सोबत घेऊ नये पण काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. कोणी कोणाला सोबत घ्यावे अशी भूमिका राजकारणात नसावी असे ते म्हणाले. यावेळी शरद पवार यांचे समवेत माजी मंत्री धनंजय मुंडे,आमदार बबनराव शिंदे व आमदार संजयमामा शिंदे हे होते.
![Header](https://vedhak.com/wp-content/uploads/2021/06/banner.jpg)