राजकिय

कारखान्यांच्या निवडणुकांनी पंढरपूर मतदारसंघातील राजकारणात नवीन समीकरणं

पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील श्री विठ्ठल व दामाजी सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या आणि यात धक्कादायक निकाल लागत प्रस्थापितांचे पानीपत झाले. जरी या कारखान्यांच्या निवडणुका असल्यातरी त्या विधानसभेप्रमाणे गाजल्या आहेत. या रणधुमाळीत येथील राजकीय समीकरण बदलून गेली आहेत. माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटाने मंगळवेढ्यात दामाजी कारखान्याच्या निमित्ताने समर्थकांना बळ देत आपला पुढील राजकीय इरादा जाहीर केल्याची चर्चा रंगत आहे.
पंढरपूर विभाग हा सहकारासाठी ओळखला जातो. येथील साखर कारखानदारी ही राज्यभर गाजते. सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका या विधानसभेप्रमाणेच लढल्या जातात. यातूनच  अनेक राजकीय नेतृत्व येथे फुलली आहेत. यामुळेच साखर कारखानदारीच्या माध्यमातून राजकीय साखर पेरणी येथे नेहमीच होत आली आहे. सध्या पंढरपूर मतदारसंघात तरूण पिढीचे राजकारण गाजत आहे. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे समाधान आवताडे विजयी झाल्यानंतर त्यांना निवडणुकीत मदत करणार्‍या परिचारक गटाने हळूहळू त्यांच्यापासून अंतर ठेवण्यास सुरूवात केली होती व ते दिसूनही येत होते. मात्र दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत परिचारक गटाने थेट आमदार आवताडे यांना विरोध केला आणि येथे भाजपा विरूध्द भाजपा असा सामना रंगविला. आ.आवताडे हे विद्यमान अध्यक्ष असताना त्यांचे  पॅनल पराभूत झाले व परिचारक गटाने राष्ट्रवादीतील भालके व मंगळवेढ्यातील आ. आवताडे विरोधकांना एकत्र आणून येथे सत्तांतर घडविले.
या घटनेचे दूरगामी परिणाम होणार हे निश्‍चित आहे. आता येणार्‍या नगरपरिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषद तसेच विधानपरिषद रणधुमाळीत याचे पडसाद पहावयास मिळतील हे निश्‍चित आहे. पंढरपूर मतदारसंघात प्रशांत परिचारक यांची प्रतिमा पोटनिवडणुकीनंतर किंगमेकर अशी बनली आहे. आता त्यांचा गट प्रत्येक निवडणुकीत सहभागी होवून आपली ताकद दाखवून देण्याच्या मूड मध्ये दिसत असून याचे प्रत्यंतर दामाजी व विठ्ठल कारखान्यात दिसून आले आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने परिचारकांनी आपल्या मंगळवेढा तालुक्यातील गटाला ताकद दिली आहे व पुढील विधानसभा निवडणुकीचा ही इरादा जाहीर केला असल्याची चर्चा आहे.
दरम्यान विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीच्यानिमित्ताने पंढरपूर मतदारसंघात आता आणखी एक तुल्यबळ नेता पंढरपूरच्या राजकारणात समोर आला असून अभिजित पाटील यांनी कारखाना जिंकला आहे. पहिल्यांदाच या निवडणुकीत उतरणार्‍या पाटील यांनी प्रस्थापित असणार्‍या भालके व काळे यांंच्यासह युवराज पाटील यांच्या गटाचा पराभव केला आहे. येथील राजकारणात विठ्ठल कारखान्याचे ÷अध्यक्ष हेच महत्वाची भूमिका बजावत आले असल्याचा इतिहास आहे. अभिजित पाटील यांनी  निवडणूक संपताच आपला इरादा जाहीर करत परिचारक गटाला आव्हानं दिले आहे. यामुळे आता ते विठ्ठल परिवाराचे नेतृत्व करण्यास इच्छुक असल्याचे दिसत आहे. यामुळे आता नवीन समीकरण ही तयार होवू शकतात. अभिजित पाटील यांनी विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने विविध शेतकरी संघटना, भाजपामधील डॉ. बी.पी.रोंगे यांना बरोबर घेत पॅनल तयार केले होते व ते जिंकले.
पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीनंतर येथे गाजली ती विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक. या निवडणुकीत आमदार समाधान आवताडे यांनी कोणताही सहभाग नोंदविला नव्हता. मात्र यंदा माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटाने युवराज पाटील गटाची साथ केल्याचे दिसत होते. तिरंगी लढतीत युवराज पाटील यांनी आपले पॅनल या कारखान्याच्या निवडणुकीत उभे केले होते व ते दुसर्‍या क्रमांकावर राहिले. या पॅनलमध्ये काही परिचारक समर्थकांना उमेदवारी देण्यात आली होती. या कारखान्याच्या निवडणुकीत परिचारकांची भूमिका ही भगीरथ भालके यांच्या विरोधात होती. तर दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत परिचारक व भालके गट एकत्र आल्याचे चित्र होते.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close